Makrand Patil – भाजपने प्रशासनाचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अडवण्यासाठी केला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या ‘यशवंत’ राजकारणात लोकशाहीचा खून केला. नीतीचे राजकारण हा या मातीचा संस्कार आहे. भाजपचे हे दहशतीचे राजकारण आम्ही चालू देणार नाही, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. मकरंद पाटील म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वीच भाजपने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मैत्रीपूर्ण चर्चेची बैठक बोलावली. पण ते आले नाहीत. त्यामुळे आम्ही निवडणूकपूर्व आघाडी केली आणि ती टिकवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे.’’ व्हीपच्या आदेशाचे उल्लंघन केले त्या सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत मकरंद पाटील यांनी दिले. कामेश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे की भाजपचे याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मतदान प्रक्रियेत ते गैरहजर राहिले. त्यामुळे संदिग्धता कायम आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही.’ भाजपचे निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी सभापती निवडीच्या संदर्भाने कोणत्याही राजकीय वाटाघाटी केलेल्या नाहीत. बाहेरच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले .सभापती निवडप्रक्रियेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सातत्याने रोखण्यात येत होते. त्यांची तीन- तीन वेळा ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. राष्ट्रवादी कांँग्रेसचे सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी या निवड प्रक्रियेच्या संदर्भाने कायदेशीर दाद मागितली आहे. तो लढा आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.