सी. पी. राधाकृष्णन यांच्याआधी महाराष्ट्राच्या ‘या’ राज्यपालांना मिळाली उपराष्ट्रपतीपदाची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

C. P. Radhakrishnan | जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना शंकर दयाळ शर्मा यांची १९८७ मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.
राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३१ जुलै २०२४ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या राज्यपालपदास अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच, त्यांनी तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
शंकर दयाळ शर्मा हे एप्रिल १९८६ ते सप्टेंबर १९८७ या काळात राज्याचे राज्यपाल होते. आर. वेंकटरामन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. पुढे पाच वर्षाने १९९२ मध्ये शर्मा यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती.
सी. पी. राधाकृष्णन यांना भाजपने संधी दिली आहे. यातच एनडीएकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील या दोन्ही राज्यपालांची आधीच्या उपराष्ट्रपतीनी राजीनामा दिल्यानंतरच निवड झाली आहे.
कोण आहेत शंकर दयाळ शर्मा?
शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म भोपाळ येथे झाला. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी राजकरणात प्रवेश केला. १९५०-५२ दरम्यान त्यांनी भोपाळ संस्थानातील काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. पुढे भोपाळ मध्य प्रदेश राज्याचा भाग बनल्यावर ते मध्य प्रदेश राज्यात मंत्री झाले. त्यांनी आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपालपद भूषिवले. १९८७ साली ते काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती या पदावर निवडून आले.
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी 3 एप्रिल 1986 ते 2 सप्टेंबर 1987 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या प्रशासकीय आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना 1987 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून 1987 ते 1992 पर्यंत सेवा केली आणि नंतर 1992 ते 1997 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले.
भाजपचा मोठा डाव
सी. पी. राधाकृष्णन यांना या पदासाठी संधी देणे हे दक्षिणेत पक्षाचा विस्तार करणं ही भाजपची मुख्य रणनीती आहे. सी. पी. राधाकृष्णन हे तमिळनाडूच्या कोयंबटूर येथील मोठे नेते आहेत. ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. पुढच्या वर्षी तमिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांच्या उमेदवारीने भाजपने मोठा डाव खेळला आहे.
तमिळनाडूत भाजपला आजवर मोठं यश मिळालेले नाही. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून दक्षिण भारतात आपली राजकीय पकड मजबूत करण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे. राधाकृष्णन यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. यामुळे पक्ष आणि संघ यांच्यातील समन्वय मजबूत होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजप प्रचारात मुद्दा करू शकते, अशी चर्चा आहे.
हेही वाचा :
तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधींची सूर्य मंदिरात भेट ; मुकेश साहनी यांनीदेखील यांच्यात चर्चा





