पुणे | पूर परिस्थितीत अधिक दक्षता घ्यावी

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – नागरिकांनी पूर परिस्थितीत अधिक दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. खडकवासला धरणातून विसर्ग सोडल्यावर नदीपात्रात प्रवाहाला अडथळा येणार नाही, यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
जुलै २०२४ मध्ये अतिवृष्टी व वादळवाऱ्यांमुळे जिल्ह्यात अनेक नागरिकांचे नुकसान झाले होते. ज्या घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना प्रशासनातर्फे मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून प्रती कुटुंब ५ हजारऐवजी १० हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार पुणे शहरातील ७ हजार ९७७ कुटुंबांना ७ कोटी ९७ लाख ७० हजार, हवेली तालुक्यातील ६८२ कुटुंबांना ६८ लाख २० हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ हजार ५१९ कुटुंबांना ७ कोटी ५१ लाख ९० हजार आणि मुळशी तालुक्यातील ९० कुटुंबांना ९ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.
याशिवाय विजेचा झटका लागून मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रु., तर मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे दरड कोसळून मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत देण्यात आली.





