BCCI : बीसीसीआय नवीन प्रशिक्षकांच्या शोधात, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘या’ तीन प्रमुख पदांसाठी मागवले अर्ज

कोच ट्रॉय कूली यांचा तीन वर्षांचा करार समाप्त –
ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रथम श्रेणी जलदगती गोलंदाज आणि इंग्लंडच्या अॅशेस विजेत्या गोलंदाजी कोच ट्रॉय कूली यांचा बीसीसीआयसोबतचा तीन वर्षांचा करार नुकताच संपला. 59 वर्षीय कूली यांना 2021 च्या शेवटी एनसीएच्या गोलंदाजी कोचपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या जागी भारताचा माजी जलदगती गोलंदाज व्हीआरव्ही सिंह यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे, ज्यांनी कूली यांच्यासोबत काम केले आहे.
याशिवाय, वैद्यकीय विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला असून, फिरकी गोलंदाजी कोच साईराज बहुतुले यांनीही एनसीए सोडली आहे. बहुतुले सध्या राजस्थान रॉयल्सच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये सामील झाले आहेत. एनसीएचे आणखी एक कोच सितांशु कोटक यांनी भारतीय राष्ट्रीय संघासोबत काम सुरू केले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : नंबर एक गोलंदाज अपेक्षांवर खरा उतरला का? बुमराहच्या कामगिरीवर इरफान पठाणने उपस्थित केले सवाल
व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा पण करार लवकरच संपणार –
भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुखपदाचा कार्यकाळ यावर्षीच्या अखेरीस संपत आहे. असे मानले जाते की, ते हा कार्यकाळ वाढवण्यास इच्छुक नाहीत. मात्र, त्यांना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पदावर राहण्याची विनंती केली जाऊ शकते.
तीन प्रमुख पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध –
बीसीसीआयने गुरुवारी तीन प्रमुख पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. फलंदाजी आणि गोलंदाजी कोच पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने माजी प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असावे आणि बीसीसीआयचे स्तर दोन किंवा तीन कोचिंग प्रमाणपत्र असावे, अशी अट आहे. फलंदाजी कोचसाठी किमान पाच वर्षांचा राज्य किंवा उच्चस्तरीय युवा स्तरावरील कोचिंगचा अनुभव आवश्यक आहे. गोलंदाजी कोचसाठीही असाच अनुभव मागितला आहे.
हेही वाचा –IND vs ENG : ख्रिस वोक्सने मागितली पंतची माफी, गिलने केले कौतुक; कसोटी मालिकेत शौर्याची झलक!
क्रीडा वैद्यक प्रमुखासाठी उमेदवाराकडे क्रीडा विज्ञान किंवा संबंधित विषयात मास्टर्स पदवी (डॉक्टरेटला प्राधान्य) आणि किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट आहे. बीसीसीआयच्या या नियुक्ती प्रक्रियेमुळे सेंटर ऑफ एक्सलन्सला नव्या दिशेने पुढे जाण्यासाठी मजबूत नेतृत्व मिळण्याची अपेक्षा आहे.





