Baramati Vs Indapur : (नीलकंठ मोहिते) – शिक्षणाचे माहेरघर असलेला पुणे जिल्हा शिक्षणात अग्रगण्य म्हणून ओळखला जात असताना इंदापूर तालुक्यातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण भागातील शाळा, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षांच्या अपुऱ्या सुविधा यामुळे तालुक्यातील युवक मोठ्या संधींपासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुक्यात गुरुकुल गोखळी शिक्षण संस्था, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, शहा ग्लोबल स्कूल तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, जेबीव्हीपी या संस्थांमधूनही चांगले व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या संस्थांनी आधुनिक शिक्षण, इंग्रजी माध्यम, तंत्रज्ञानाधारित शिक्षण यामध्ये पुढाकार घेत विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही इंदापूर तालुक्यात उच्च दर्जाचे, सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक शिक्षण अजूनही अपुरेच असल्याचे चित्र आहे. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हजारो रुपयांची फी आकारली जाते. या संस्था विनाअनुदानित असल्याने त्यांना शैक्षणिक व्यवस्था चालवण्यासाठी फी आवश्यक आहे, हे वास्तव आहे. मात्र, सर्वसामान्य आणि गरीब पालकांसाठी हा मोठा आर्थिक बोजा ठरत आहे. त्यामुळे जर जिल्हा परिषद शाळांमधूनच दर्जेदार शिक्षण दिले गेले. तर, हजारो कुटुंबांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. दरम्यान, इंदापूर तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक वसाहती काही प्रमाणात विकसित झाल्या असल्या, तरी स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी, अनेक तरुण हाताला काम नसल्याने चुकीच्या मार्गाकडे वळत असल्याचेही चित्र काही भागांत दिसून येत आहे. शिक्षण आणि रोजगार यांचा थेट संबंध असल्याने, या दोन्ही क्षेत्रांमध्ये समन्वयाने काम होणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर कौशल्य विकास केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, तसेच उद्योग-शिक्षण जोडणारे उपक्रम राबवणे ही काळाची गरज बनली आहे. जिल्हा परिषद शाळा. बारामतीशी तुलना: इंदापूर मागे का? शेजारचा बारामती तालुका शिक्षणाच्या बाबतीत झपाट्याने प्रगत झाला असून तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम मार्गदर्शन, दर्जेदार महाविद्यालये आणि विविध संधी उपलब्ध आहेत. त्या तुलनेत इंदापूर तालुका मात्र अजूनही मागेच असल्याची खंत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तालुक्यात परिपूर्ण आणि दर्जेदार मार्गदर्शन देणाऱ्या संस्था अत्यल्प आहेत. गोखळी संस्थेचा अपवाद वगळता इतरत्र योग्य दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुणे, बारामतीसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील अग्रगण्य जिल्हा परिषद म्हणून ओळखली जाते. मात्र, याच जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाड्या-वस्त्यांवरील जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहेत. या शाळांमध्ये इमारती, साहित्य, काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असतानाही शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही अपवादात्मक शाळा वगळता अनेक ठिकाणी “फक्त पगारासाठी शाळा चालवली जाते” अशी टीका पालकांकडून होत आहे. नुसते वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून शिक्षणाची गुणवत्ता वाढत नाही. तर, विद्यार्थ्यांना आधुनिक, कौशल्याधारित आणि स्पर्धात्मक शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी परिपूर्ण घडला पाहिजे ही भूमिका प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी स्वीकारण्याची गरज असल्याचे नागरिक ठामपणे मांडत आहेत. उपाययोजनांची गरज इंदापूर तालुक्यात शिक्षण व्यवस्था सक्षम झाली आणि तरुणांच्या हाताला काम मिळाले, तरच तालुक्याचा खरा विकास होईल, अशी ठाम भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत. यासाठी शासन स्तरावरून इंदापूर तालुक्यासाठी विशेष धोरण, शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभारणे आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे यांसारख्या प्रभावी उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक आहे. अन्यथा, शिक्षण असूनही संधी नाही. हीच परिस्थिती पुढील पिढीलाही भोगावी लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.