Baramati News: “तरच रासायनिक विषबाधा टळेल…”; कृषी दिनी सभापती किरण तावरे यांचे जाहीर आवाहन
Baramati News: बारामती पंचायत समितीत कृषी दिन उत्साहात साजरा; विषमुक्त अन्न आणि मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन.

Baramati News – काळाची गरज लक्षात घेता सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यावर भर दिला पाहिजे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढविणे ही आजची गरज आहे. नागरिकांनीही विषमुक्त फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. १ रोजी पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, सदस्य नितीन काकडे, उज्जवला खैरे, आशा वायाळ, उप विभागीय कृषी अधिकारी रश्मी जोशी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके,
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे व विषय विशेषज्ञ संतोष करंजे, शेतकरी सन्मान समितीचे अध्यक्ष अशोक तावरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफूल, बाजरी, सोयाबीन या पिकामध्ये राज्यस्तरीय तसेच तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कऱ्हाटी येथील नारायण बाबा लोणकर यांनी सुर्यफूल पीकात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे, यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
चोरमले यांनी बदलत्या हवामानचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेती करावी. कृषी विभागाच्या सल्ला विचारात घेता पीकाचे नियोजन करावे, असेही चोरमले म्हणाले. माने म्हणाले, गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेतकरी उत्पादक गट तयार तयार करावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
फळ पिकांचा विमा काढून घ्यावा
हाके यांनी कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देवून ते पुढे म्हणाले, फळ पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा. हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ होईल, असेही हाके म्हणाले.




