Baramati News – महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून किफायतशीर, नियमित व कार्यक्षम सेवा अपेक्षित असताना बारामती आगारातील व्यवस्थापनाविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बस उपलब्ध असूनही वेळापत्रकाचा खोळंबा होत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बस वेळेवर न येणे, बस क्षमतेपेक्षा जास्त भरून येणे, काही थांब्यांवर बस न थांबवणे, फेर्यांची संख्या कमी करणे तसेच काही लांब पल्ल्याच्या मार्गावरील सेवा अचानक बंद करणे, अशा प्रकारांमुळे वृद्ध, विद्यार्थी व नोकरदार वर्गांचे मोठे हाल होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बारामती आगारातील बस निरा-बारामती, बारामती-जेजुरी, बारामती-वालचंदनगर आदी मार्गांवर वारंवार बंद पडत असल्याची तक्रार आहे. काही चालक बेफिकीरपणे वाहन चालवत असल्याचाही आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीदवाक्यानुसार ग्रामीण ते शहरी भागाला जोडणारी ही सेवा सध्या बारामती परिसरात विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. अपुर्या फेर्या, अपघातांच्या घटना, वेळेवर बस न येणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देताना विचारले, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असताना वयोवृद्ध किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना गुदमरून अपघात झाल्यास जबाबदार कोण? या पार्श्वभूमीवर बारामती आगार व्यवस्थापनाविरोधात संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून परिवहन मंत्र्यांनाही माहिती देण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.