सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत मोठा फेरबदल करण्यात आला असून बारामती पंचायत समितीचे माजी सभापती संदीप बांदल यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. बारामतीचे तालुकाध्यक्ष सोमेश्वरकडून गुणवडीकडे सरकले असून उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी युवा चेहऱ्यांना धक्कातंत्र अवलंबिले असल्याचे स्पष्ट झाले. मागील काही दिवसांपासून तालुका अध्यक्षपदाच्या बदलाबाबत चर्चा रंगल्या होत्या. अनेकांची नावे समोर येत असताना अखेर अजित पवार यांनी सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत गुणवडी पंचायत समिती गणातील संदीप बांदल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर गुणवडी गणातील राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची कमान यापूर्वी संभाजी होळकर यांनी सांभाळली होती. त्यांनी तालुक्यातील तळागाळातील सर्व घटकांना न्याय देत संघटन बांधणी केली होती. होळकर यांनी तालुकाध्यक्षपदाला साजेसे काम केले होते. होळकर यांनी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहून अनेक निवडणुका एकहाती जिंकत बारामतीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रबळ वर्चस्व टिकवून ठेवले होते. राष्ट्रवादीत फूट पडूनही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने बारामतीतील बहुतांश संस्था आणि सत्तास्थाने ताब्यात ठेवत पक्षाला स्थिर ठेवले आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या अल्प कार्यकाळातच पक्ष संघटनेला तळागाळापर्यंत नेण्याचे काम झाले आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णायक विजय मिळवला आहे. तरूणांची फळी उभारणीची काम सुरू तथापि, गेल्या महिनाभरापासून बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चेला उधाण आले होते. अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपले “धक्का तंत्र” वापरत, अनपेक्षित पणे गुणवडी गणातील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेले संदीप बांदल यांची निवड केली. राजकीय वर्तुळात या निर्णयाला “अजित पवारांचे धक्का तंत्र” असे संबोधले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून अजित पवार यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका, साखर कारखान्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून यंग ब्रिगेडला संधी देत समतोल साधला आहे. ज्येष्ठ आणि तरूणांचा समतोल साधल्याने संघटन मजबूतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.