Nirmala Sitharaman warns: बँकांनी ग्राहकांना गरज नसलेली वित्तीय उत्पादने दिशाभूल(मिस सेलिंग) करून विकू नयेत. असे करणे भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सांगितले आहे. अर्थसंकल्पानंतर रिझर्व बँकेच्या संचालक मंडळांबरोबर चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सितारामन यांनी सांगितले की, बँकांनी आपले मूळ काम करण्यावर भर द्यावा. त्यांनी विमा उत्पादने विकण्यावर जास्त भर देऊ नये. त्याचबरोबर विमा उत्पादने बँकांकडून विक्री केली जात असताना त्याकडे देखरेख रिझर्व बँकेने ठेवावी की आयआरडीएआयने ठेवावी याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. यातून बँकांकडून ग्राहकांना विमा उत्पादने आणि इतर बिगर बँकिंग उत्पादने विकली जात असल्याचा प्रकार घडत आहेत. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते आणि ग्राहकांचे नुकसान होते असे सीतरामन यांनी सांगितले. रिझर्व बँक मिस सेलिंग वर एक जुलैपासून कखडक उपाययोजना करणार आहे. यासंदर्भात एक मसुदा चर्चेसाठी जारी करण्यात आला आहे. ही बाब समाधानकारक आहे असे सितारामन यांनी सांगितले. हेही वाचा – इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात मोठी झेप; सोने १,६२,८०० तर चांदी २,७२,००० रुपयांवर ग्राहकाकडे अगोदरच विमा असताना बँका ग्राहकांच्या गळ्यात विमा टाकत आहेत. याकडे लक्ष देणे विमानियंत्रकाचे काम आहे, म्हणून रिझर्व बँक लक्ष देत नाही. बँकांकडे लक्ष देण्याचे काम रिझर्व बँकेचे आहे म्हणून विमा नियंत्रक लक्ष देत नाही. तर दुसरीकडे ग्राहक अशी विचारणा करीत आहे की मी सोने, जमीन. घर तारण ठेवून कर्ज घेत असताना बँक मला पुन्हा विमा घेण्यासाठी का आग्रह करीत आहे. सितारामन यांनी सांगितले की, अशाप्रकारे अयोग्य उत्पादने बँकांनी ग्राहकांना विकण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मूळ कामावर अधिक लक्ष द्यावे. ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्यात आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर बँकाकडील करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मधील ठेवी का कमी होत आहे याबद्दल विचार करावा आणि या ठेवी वाढविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून बँकातील ठेवींचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत बँकासमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.