मुंबई – यजमान भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाचा दुसऱ्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या. सलामीवीर अलीसा हिली 25 धावांवर बाद झाल्यावर त्यानंतर मात्र, बेथ मुनी व ताहिला मॅकग्रा यांनी नाबाद अर्धशतके फटकावताना संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मुनीने नाबाद 82 धावांची खेळी करताना 54 चेंडूत 13 चौकार फटकावले. मॅकग्राने आपल्या नाबाद 70 धावांच्या खेळीत 51 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 1 षटकार फटकावले. भारतीय महिला संघाच्या दीप्ती शर्माने एकमेव बळी घेतला.
Australia lose their first T20I of 2022 as India level the series 1-1 with a Super Over win 🎉#INDvAUS | https://t.co/eX1HPRfID6 pic.twitter.com/16683tGGNJ
— ICC (@ICC) December 11, 2022
विजयासाठी 188 धावांचा पाठलाग करताना भारताच्या महिला संघाने 5 बाद 187 धावाच केल्या व सामना टाय झाला. सलामीवीर स्मृती मानधना, शफाली वर्मा व रिचा घोष यांनी आक्रमक फलंदाजी केली. मानधनाने 79 धावा करताना 49 चेंडूत 9 चौकार व 4 षटकार अशी फटकेबाजी केली. शफालीने 23 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 21 धावांवर बाद झाल्यावर आलेल्या रिचा घोषने 13 चेंडूत 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 26 धावांची खेळी केली व संघाला नेमक्या 187 धावाच करून दिल्या.
हा सामना टाय झाल्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात भारतीय संघाने 1 गडी गमावून 20 धावा केल्या. 21 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला केवळ 16 धावाच करू शकला व भारताने 5 धावांनी हा सामना जिंकला.