Balkrushna Nikam – सिक्कीमच्या दुर्गम भागात चीनच्या सीमारेषेवर कर्तव्य बजावत असताना निधन झालेले पिंपळोशी, ता. पाटण येथील जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय 41) यांच्यावर शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी त्यांच्या पार्थिवाची पाटण शहरातून सकाळी 8 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली होती. शालेय विद्यार्थी व नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, पुष्पवृष्टी करत, वीर जवानाला मानवंदना दिली. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून, वीरजवान बाळकृष्ण निकम यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप दिला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी अशोकराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, लष्करी अधिकारी, विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हवालदार बाळकृष्ण निकम हे सिक्कीमच्या दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना, बुधवारी (दि. 11) दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पिंपळोशीसह संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली होती. बाळकृष्ण निकम हे बाबू या नावाने परिसरात परिचित होते. सांगली येथे झालेल्या सैन्य भरतीत 2003 साली त्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. पुणे येथे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंजिनिअर रेजिमेंटच्या युनिट क्र. 120 मध्ये हवालदार म्हणून कार्यरत झाले होते. त्यांनी सियाचीन, लडाख अशा अतिसंवेदनशील भागात देशसेवा केली होती. सध्या ते सिक्कीममधील शेरावानी परिसरात सुमारे दोन हजार मीटरहून अधिक उंचीच्या डोंगराळ भागात रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम, मुले प्रणव व अर्णव, आई, वडील, लहान भाऊ शिवराज, बहीण, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे जिल्ह्यातील मंत्र्यांची अनुपस्थिती जवान बाळकृष्ण निकम यांना वीरगती प्राप्त झाल्याचे वृत्त वार्यासारखे सातारा जिल्ह्यात पसरले होते. जवान बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव पाटण तालुक्यात शनिवारी सकाळी 7 वाजता दाखल झाले. जिल्ह्यातील चार मंत्र्यांपैकी एकही मंत्री वीरजवानाला अभिवादन करण्यासाठी पिंपळोशीकडे फिरकला नाही.