दिशा सालियनच्या वडिलांनी काल मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. यानंतर या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून अनिल परब, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकरणावर आता काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बाळासाहेब थोरात? 2014 पासून देशात आरोपांच्या दबावाचं राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमागे राजकारण असण्याची शक्यता आहे. दबाव तंत्राचा हा एक भाग असू शकतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटतं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काय आहे नेमके दिशा सालियन प्रकरण? दिशा सालियन प्रकरण हे एक हायप्रोफाईल आणि वादग्रस्त प्रकरण आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन हिचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. तिचा खून झाला कि तिचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिशा सालियन ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका उंच इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला. ती पडली कि तिला वरतून खाली फेकले हे अद्याप रहस्य आहे. पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगून अपघाती मृत्यूचा अहवाल (ADR) दाखल केला. तथापि, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. यानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण बनले. घटनेच्या वेळी दिशा हि होणारा नवरा रोहन राय आणि तिची मैत्रीण यांच्यासोबत रोहन रायच्या अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावर पार्टी करत होते. यादरम्यान ही घटना घडली.