मुंबई – भारतासह जगाला गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्रस्त करून सोडणाऱ्या करोना महामारीच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दोन दिवसांपूर्वी तर भारतात रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला. जगात सर्वात जास्त रुग्ण वाढ आता भारताच्या नावावर नोंदवली गेली आहे. एकीकडे अशीही भीतीदायक आकडेवारी समोर येत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ऑक्सिजनची टंचाई, लसींची टंचाई आणि रुग्णालयामधील बेडची टंचाई या नकारात्मक गोष्टी समोर येत आहे.
राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे की,’मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, आमच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले,’आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. लसीकरणाची जबाबदारी केंद्राची असली तरी जबाबदारी आमच्यावर ढकलली आहे. परंतु आम्ही ही जबाबदारी समर्थपणे पाळू, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.