बंदला साथ देणार नसल्याची व्यापाऱ्यांची माहिती
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा , राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक दिली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.
आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो.
सततच्या बंदचा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आहे. 29 जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असं निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.
सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एनआरसीला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे बंद केले जात आहे. दर दोन दिवसांनी कोणता तरी पक्ष किंवा संघटना बंद पुकारत असतो यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही, कोणी आमच्या व्यापारी प्रतिष्ठानवर दगडफेक केल्यास आणि नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असं निवेदन उदगीरच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
बदलापुरात भारत बंदसाठी पत्रकं वाटताना बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वच्या शिवाजी चौकात एका गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी हॉकी स्टिक, रॉडने कार्यकर्त्यांना केली. तसंच पत्रकं फाडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.