Bachchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रहार स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजकीय वैमनस्यातून बच्चू कडू यांनी त्यांना अपघातात ठार मारण्याचा कट रचला असल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Bachchu Kadu काय म्हणाले बच्चू कडू? “कट रचणे हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक आहोत. कोणाचा जीव घेणारे लोक नाही.” बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळून लावताना सांगितले की, “मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला गेला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दीड लाख रुपये मिळावे यासाठी मी आंदोलन करणार होतो. बच्चू कडूला बदनाम करण्याचा आणि अटक करण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “अशा पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वतःहून अटक होऊ. प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून आम्ही अटक करून घेऊ. मी उद्यापासून एव्हरेस्ट बेस कॅम्पला चाललो आहे. देवाचीच अकृपा झाली तर आम्ही काय करणार? सत्ता तुमची, एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅब तुमची. कट रचणे हा आमचा धंदा नाही.” बच्चू कडू हे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन आणि ग्रामीण भागातील मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. प्रहार स्वाभिमानी पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक सामाजिक आणि शेतकरी संघर्षांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. मात्र राजकीय वैर आणि विरोधकांशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांच्यावर अनेकदा आरोप होत असतात. या नव्या प्रकरणामुळे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणातील तपास कसा पुढे जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.