अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदाराने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. राजकुमार पटेल यांनी विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. त्यांनी साथ सोडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजकुमार पटेल आधी बसपा, भाजपा, राष्ट्रवादी आणि प्रहार संघटनेमध्ये होते. आता ते प्रहार संघटनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. पाचव्यांदा ते पक्षांतर करत असल्यामुळे अमरावतीमधील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. येत्या ३ सप्टेंबरला राजकुमार पटेल अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अमरावतीमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता. आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी ७ वेळा विधानसभा निवडणूक लढवली. यात ३ वेळा ते मेळघाटमधून आमदार झाले होते. तर ४ वेळा त्यांचा पराभव झाला होता.