मुंबई : सध्या सगळ्यांचे लक्ष आता आगमी महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत भाजप आणि मनसे या दोन पक्षांची आगमी महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यतेच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा वापर केला जात असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले अविनाश जाधव? शिवसेना संपवण्याचं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं आहे. २०१९ साली ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसाने केली आणि काँग्रेसबरोबर गेले त्या दिवसापासून शिवसेनेची उतरती कळा सुरू झाली होती.बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे मनेसचा विचार संजय राऊतांनी करू नये. आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा आमच्या ताकतीवर उभे राहू. बाळासाहेबांना देखील उभं राहायाल ३७ वर्ष लागली होती. त्यामुळे आम्हाला काही घाई नाही. संजय राऊतांना सत्तेत बसण्याची, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता बसवण्याची घाई असते, त्यामुळे संजय राऊत हे शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की, असे अविनाश जाधव म्हणाले. संजय राऊत काय म्हणाले होते? मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे असे विधान संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात केले.