आसाममधील पूरस्थिती कायम; एक लाखांपेक्षा जास्त लोकांची अजूनही पुराशी झुंज, आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू

दररंग: पावसाने देशात यंदा वेगळाच गोंधळ घातला आहे. कुठे पावसाचे जास्त तर कुठे कमी प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात जरी पावसाने काही भागात ओढ दिली असली तरी तिकडे आसाममध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, आसाममधील परिस्थिती सुधारली आहे. मात्र, सात जिल्ह्यांतील 1.22 लाखांहून अधिक लोक अजूनही पुराचा सामना करत आहेत. यामध्ये बारपेटा, चिरांग, दररंग, गोलाघाट, कामरूप महानगर, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांचा समावेश आहे.
माध्यमातुन समोर आलेल्या माहितीनुसार, आसाममधील दररंग हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील 60 हजार 600 हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यानंतर गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचवेळी, शनिवारपर्यंत 13 जिल्ह्यांतील सुमारे 2.43 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. रविवारी आसाममधील पुरामुळे मृत्यू झाल्याची बातमी नाही, त्यामुळे मृतांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.
राज्य प्रशासन तीन जिल्ह्यांमध्ये 7 मदत शिबिर चालवत आहे, जिथे 1 हजार 331 लोक आश्रयाला आहेत. याशिवाय चार जिल्ह्यांमध्ये 17 मदत वितरण केंद्रही चालवली जात आहेत. एएसडीएमएने सांगितल्याप्रमाणे, सध्या आसाममधील 583 गाव पाण्याखाली आहेत आणि राज्यभरातील 8,592.05 हेक्टर पीक क्षेत्र नष्ट झाले आहे. आसाममधील 97 हजार 400 हून अधिक पाळीव प्राणी आणि कोंबड्या पुरामुळे बाधित झाल्या आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत आसाममध्ये पुरामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत अहवालात, राज्यातील पूरग्रस्तांची संख्या अडीच लाखांवर आली असून आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.





