टी-२० विश्वचषकातील २३ ऑक्टोबर रोजीचा भारत-पाकिस्तान सामना सर्वांच्याच कायम आठवणीत राहणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ४ गडी राखून बाजी मारली. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे सांगणे कठीण होते. विराट क्रीझवर उभा तर होता पण शेवटची विजयी धाव रविचंद्रन अश्विनच्या बॅटमधून निघाली. अश्विनने हजरजबाबीपणा दाखवत नवाजच्या शेवटच्या चेंडूवर भारताला विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर बोलताना आर. अश्विनने दिनेश कार्तिकच्या बाद होण्याबाबत मोठा खुलासा केला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात सापशिडीप्रमाणे खेळ पाहायला मिळाला. सामन्यावर कधी भारताची पकड तर कधी पाकिस्तानची पकड असेच सुरु होते. भारताला शेवटच्या मोहम्मद नवाजच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिक पंड्या मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. यानंतर विराटने एक षटकार आणि फ्री-हिट चेंडूवर काढलेल्या ३ धावांसह भारत अजूनही सामन्यात होता.
#INDvsNED । सामन्याअगोदरच नेदरलॅंड्सच्या कॅप्टनला वाटतेय विराटची भीती, म्हणाला…
यानंतर शेवटच्या २ चेंडूसाठी दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला होता. सर्वांना वाटले होते की, कार्तिक एखादा मोठा फटका खेळून सामना संपवेल, मात्र घडले वेगळेच अन कार्तिक घाईगडबडीत यष्टिचित झाला. आता भारताला शेवटच्या चेंडूवर २ धावांची आवश्यकता होती आणि आर. अश्विन स्ट्राईकवर होता. पण यावेळी अश्विनने हुशारी दाखवली आणि नावाजने पॅडवर टाकलेल्या चेंडूला पुढे सरकत वाट मोकळी दिली. पंचांनी तो चेंडू वाईड दिला. यानंतर आता भारताला १ चेंडूत १ धाव हवी होती. याठिकाणी अश्विनने चेंडूला ३० यार्डच्या बाहेर ढकलले आणि १ धाव घेतली.
या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना अश्विन म्हणाला की, “ज्या क्षणी मी पाहिलं की चेंडू लेग साइडला जात आहे, तेव्हाच मला वाटले की मी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील करू नये. मी चेंडू सोडला आणि वाईड बॉलवर आम्हाला अतिरिक्त धाव मिळाली. ती वाईडची धाव आल्याने मी एकदमच मोकळा श्वास सोडला.”
“जेव्हा मी फलंदाजीला जात होतो, तेव्हा प्रथम मी दिनेश कार्तिकला मनातल्या मनात खूप कोसले आणि मग विचार केला, नाही… नाही… आम्हाला अजूनही चांगली संधी आहे. त्यानंतर मी विराट कोहलीला पाहिले, त्याने माझ्याशी बोलून काही गोष्टी सांगितल्या. माझ्या मनात विचार आला की, आज देवाने विराटला खूप काही दिले आहे, मग देव मला निराश कसा करेल.”
“मग मी ठरवलं शेवटच्या चेंडूवर नीट बघून गॅपमध्ये खेळायचे. ती शेवटची धाव घेताच मला खूप आनंद झाला कारण आता माझ्या घरावर कोणी दगडफेक करणार नाही. (हसत म्हणाला ) मला वाटले होते की जर देवाने विराटला हरिस रौफच्या चेंडूवर दोन षटकार मारण्याची जिद्ध दिली आहे तर मला थोडी तरी जिद्ध देईल.”