Ashish Shelar : बोर्डाची वेबसाइट सायबर सुरक्षित करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनी दिली सूचना

मुंबई : दहावी, बारावी बोर्डाच्या वेबसाइटची क्षमता वाढवणे व सायबर सुरक्षित करण्याबाबत येत्या 7 दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. दहावी, बारावी निकालाची तारीखेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेबसाइट बाबत आढावा घेण्यासाठी आज बोर्डाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्री आशिष शेलार यांनी घेतली.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोर्डाच्या वेबसइटची क्षमता व त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती मंत्री आशिष शेलार यांनी जाणून घेतली. यावेळी बोलताना शेलार यांनी उपरोक्त निर्देश दिले.
10 व 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो मुले एकाच वेळेस वेबसाइटवर लॉगइन करून आपला निकाल पाहतात. त्यावेळी सदर वेबसइटवर ताण येऊन ती साइट क्रॅश होते व विद्यार्थ्यांची गैरसोय होते. सदर प्रणालीचे सतत लोड टेस्टिंग करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तिची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्याच्या वेबसाइटच्या क्षमतेचा अहवाल तयार करा आणि त्या वेबसाइटची क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत अहवाल तयार करा, असे आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले.





