Ashadhi Wari: पुणेनगरी सज्ज! आज दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन; दोन दिवस दुमदुमणार हरिनामाचा गजर
Ashadhi Wari: वारकऱ्यांच्या निवासासाठी महापालिका शाळांची व्यवस्था; पाणीपुरवठा, औषधोपचार आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात.

Ashadhi Wari – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे (उद्या) गुरुवारी (दि. ९ जुलै) पुणे शहरात आगमन होणार आहे. यासाठी महापालिका स्तरावर स्वागताची तयारी करण्यात आली असून, दोन्ही पालख्यांचा मुक्काम दोन रात्र पुण्यात असणार आहे. देहूहून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने मंगळवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने बुधवारी आळंदीतून पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे.
या दोन्ही पालख्या गुरुवारी पुण्यात मुक्कामी येणार आहेत. वाकडेवाडी येथे महापौर आणि महापालिका प्रशासन हे पालख्यांचे स्वागत करतील. या पालख्या वाकडेवाडीतून फर्गसन रस्त्याने शहराच्या मध्यभागात प्रवेश करतात. या मार्गावर ज्ञानेश्वर आणि तुकाराम पादुका चौकात आरती होऊन त्या पुढे मार्गस्थ होतात. त्यानंतर खंडुजीबाबा चौकात खंडुजीबाबा मंदिरात आरती होऊन पालख्या लक्ष्मी रस्त्याला लागतात. या संपूर्ण रस्त्यांवर दुतर्फा भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.
त्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी तेथूनच जवळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी जाते. पालख्यांसोबत आलेल्या दिंडेकऱ्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये केली आहे. याशिवाय त्यांच्यासाठी आरोग्य, औषधे जेवण, पाणीपुरवठा आदींची व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे.
पालखी विठोबा मंदिरात पालखी मुक्कामाविषयी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बराच वादंग झाला होता. पालखी मुक्काम अन्यत्र हलविण्याबाबत पालखी सोहळा कमिटीने निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करत पालखी विठोबा मंदिराच्या शेजारच्या मिळकती योग्य मोबदला देऊन पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे हा परिसर बऱ्यापैकी मोठा झाला असून, येथे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली आहे.





