Ashadhi Wari 2025 : माऊलींच्या पालखी सोहळ्यात सापडलेला 10 तोळे सोन्याचा गोफ केला परत

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी आज पंढरपूरच्या दिशेने पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. या पवित्र सोहळ्याला निरोप देण्यासाठी आळंदी येथील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, या गर्दीत मॅगझीन चौक, दिघी येथे एक धक्कादायक घटना घडली.
कळंबोली, मुंबई येथील भाविक शैलेंद्र पाटील यांची 10 तोळे वजनाची सोन्याची चैन चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चैन खाली पडली. ही चैन आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना सापडली. त्यांच्यासोबत त्यांच्या नणंद सविता आहेर, धनश्री प्रगळे आणि मोहिनी वाघ या महिलाही उपस्थित होत्या.
कांचन यांनी तातडीने दिघी पोलीस ठाण्यात जाऊन चैन जमा केली. याचवेळी शैलेंद्र पाटील तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. हरवलेली चैन परत मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “माऊलींनीच कांचन यांच्या रूपात येऊन माझी चैन मिळवून दिली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पालखी सोहळ्यासारख्या पवित्र प्रसंगी अशी प्रामाणिकता समाजासमोर आदर्श ठरली आहे. दिघी पोलिसांनीही या घटनेची नोंद घेत कांचन यांचे आभार मानले.
या घटनेने आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शैलेंद्र पाटील यांनी कांचन यांचे विशेष आभार मानले आणि माऊलींच्या कृपेने हा चमत्कार घडल्याचे सांगितले.





