रांजणी : शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून 2024 साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रमत नसल्याचे संकेत मिळत आहेत. आढळराव पाटील यांची सध्याची राजकीय परिस्थिती आणि भवितव्य पाहता ते पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरीने गेली दोन वर्ष पक्षाचे काम करत असताना आढळराव पाटील यांचा राजकीय आलेख कमी होत चालला असल्याचे दिसून आल्यामुळेच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ज्ञांना अंदाज आहे. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रथम शिरूर लोकसभेची निवडणूक लढवली. आपल्या पहिल्याच खासदारकीच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्यात आढळराव पाटील विजयी झाले. सलग तीन वेळा शिरूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे आढळराव पाटील शिवसैनिकांच्या मनात भरले. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना तारण्याचे काम खऱ्या अर्थाने आढळराव पाटील यांनी केले. दरम्यान 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, पराभवानंतर देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या लांडेवाडी येथील निवासस्थानी असणारा प्रत्येक रविवारी भरणारा जनता दरबार चालूच ठेवला आणि ते सातत्याने लोकसंपर्कात राहिले आणि अद्यापही आहेत. दरम्यानच्या कालखंडात उद्धव ठाकरे यांच्या दरबारात आढळराव पाटील यांना मानाचे स्थान मिळत नसल्याने त्यांनी, एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून आढळराव पाटील पश्चिम महाराष्ट्रात परिचित झाले. 2024 साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या. राज्यात भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती असल्याने शिरूर लोकसभेची उमेदवारी साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली. त्यामुळे उमेदवारी मिळण्यासाठी आढळराव पाटील यांनी पुन्हा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेली दीड, दोन वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज अत्यंत इमाने – इतबारे करत आहेत. दरम्यानच्या कालखंडात नुकत्याच नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने उत्तर पुणे जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका लढवल्या. या निवडणुकांमध्ये असे दिसून आले की जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढत चालले आहे. विशेषत: आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून यावा यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, प्रत्यक्षात मंचरचा नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा निवडून आला. त्यामुळे आढळराव पाटील यांना राजकीय धक्का बसल्याचे देखील मानले जात आहे. भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा शिवसेना पक्षातच आपली मोठी राजकीय ताकद राहील, असेही कदाचित आढळराव पाटील यांना वाटत असावे.दरम्यान आढळराव पाटील यांच्याप्रमाणेच आंबेगाव तालुक्यातील एका माजी आमदाराचा नातू देखील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा तालुक्यात झडत आहेत. पवार, वळसे पाटलांबरोबरच्या चर्चेनंतरच प्रवेश शिवसेना प्रवेशाबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका सुनील बाणखेले या माझ्या विचाराच्या उमेदवार होत्या. नगरपंचायत निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा क्रॉस वोटींगमुळे झाला. पराभवानंतर माझ्या कार्यकर्त्यांशी बैठक झाली. त्या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. माझ्या आगामी राजकीय राजकारणासंबंधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसेपाटील यांच्या बरोबर बोलणार आहे.