Shakuntalabai Saptal : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्येचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shakuntalabai Saptal : संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीतील थोर लोकशाहीर, कादंबरीकार कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतलाबाई अजित सपताल यांचे रविवारी (२ ऑगस्ट २०२६) पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Shakuntalabai Saptal : लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतलाबाई अजित सपताल यांचे रविवारी (2 ऑगस्ट 2026) पहाटे 2.45 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. ब्रेन स्ट्रोकनंतर गेल्या काही दिवसांपासून नालासोपारा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Shakuntalabai Saptal)
शकुंतलाबाई या अलीकडच्या काळात नालासोपारा येथे मुलगा प्रशांत यांच्या निवासस्थानी राहत होत्या. त्यांच्या पार्थिवावर नालासोपारा येथे कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात संजय, राजेश, प्रशांत ही तीन मुले, नंदिनी ही मुलगी तसेच नातवंडे असा परिवार आहे. (Shakuntalabai Saptal)
शकुंतलाबाई यांचा विवाह इस्लामपूर येथील अजित सपताल यांच्यासोबत झाला होता. हा विवाह स्वतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लावून दिला होता. बालपणापासूनच त्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात सक्रिय होत्या. ज्येष्ठ बहीण शांताबाई, रोझा डांगे, कमल आणि सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी (संझगिरी) यांच्यासह त्यांनी बालसंघ आणि सांस्कृतिक कला पथकात काम केले. तसेच आई जयवंताबाई साठे यांच्या सोबत पक्षाच्या मुखपत्रांच्या विक्रीतही त्या आघाडीवर होत्या. (Shakuntalabai Saptal)
अण्णाभाऊ साठे भूमिगत असताना त्यांच्यापर्यंत पक्षाचे साहित्य आणि पत्रके सुरक्षितपणे पोहोचवण्याचे महत्त्वाचे कामही शकुंतलाबाईंनी केले. अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्यांच्या त्या पहिल्या वाचक होत्या. त्यांच्या हस्ताक्षरातील मजकूर वाचून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे कामही त्या करत असत. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. (Shakuntalabai Saptal)
अण्णाभाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींवर आधारित लेखही शकुंतलाबाईंनी विविध दिवाळी अंकांमध्ये लिहिले. विशेषतः ‘फकिरा’ कादंबरीच्या लेखन प्रक्रियेवरील त्यांचा लेख मोठ्या प्रमाणात गाजला होता. अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा त्यांना सखोल अभ्यास होता. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या एका पुस्तकाचे समर्पणही शकुंतलाबाई आणि शांताबाई या दोन्ही कन्यांना केले होते. (Shakuntalabai Saptal)





