Anna Hazare : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक स्तरावर शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे परिणाम जगभरात जाणवत आहेत. या संघर्षामुळे हजारो नागरिकांचा जीव गेला असून महिला, मुले आणि सामान्य कुटुंबांवर मोठा परिणाम होत असल्याची चिंता हजारे यांनी व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, भारताची परंपरा ही अहिंसा, शांतता आणि संवाद यावर आधारित आहे. त्यामुळे भारताने जगासमोर संवादाचा मार्ग ठेवत शांततेसाठी पुढाकार घ्यावा. युद्धामुळे केवळ विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निर्माण होतो, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निरपराध नागरिकांवर होत असलेले परिणाम अत्यंत दु:खद असल्याचे सांगत, भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने मानवतेचा संदेश देत शांततेसाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे अण्णा हजारे यांनी नमूद केले आहे. ‘जगाला शस्त्रांची नव्हे, संवादाची गरज’ आजच्या जगाला शस्त्रांची नव्हे तर विश्वास, सहकार्य आणि संवादाची गरज आहे. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांततेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी पत्रातून केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत भारताने मानवतेच्या आणि शांततेच्या बाजूने उभे राहत संवादाचा मार्ग मजबूत करावा, अशी अपेक्षाही अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.