Anil Parab : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान सत्ताधारी महायुतीमधील दोन मंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, राज्याच्या राजकारणात नवा कलगीतुरा रंगला आहे. “मंत्र्यांनाच मारहाण होत असेल, तर हे सरकार सामान्य जनतेचे रक्षण काय करणार?” असा सवाल करत, उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान केले. विधान परिषदेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत अनिल परब म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मंत्र्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ सत्तेच्या मोहापायी भाजपची दादागिरी सहन करणाऱ्या शिंदे गटआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा स्वाभिमान कुठे गेला? असा सवाल त्यांनी केला. “भाजप तुम्हाला चिरडत आहे, तरीही तुम्ही गप्प का? तुमच्यात हिंमत असेल तर या अपमानास्पद युतीतून बाहेर पडा,” असे आव्हान परब यांनी सभागृहात दिले. शुक्रवारी झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षनिवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी (सुनेत्रा पवार गट) यांच्या संयुक्त उमेदवाराचा पराभव केला. बहुमत असूनही सत्ताधारी मित्रपक्षांचा उमेदवार पडल्याने आणि मतदानापूर्वी पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्यांना ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र, अनिल परब यांनी या निर्देशावरही आक्षेप घेत, उपसभापतींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा दावा केला आणि त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केल्याने सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अनुभव कडू पण आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र – देसाई यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील अनुभव अत्यंत कडू असल्याचे मान्य केले. मात्र, “आम्ही हतबल आहोत असे समजू नका. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत आणि अशा घटनांची योग्य स्तरावर दखल घेऊन त्या सुधारल्या जातील,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. Anil Parab तसेच परबांच्या टीकेला उत्तर देताना, “आम्ही कोणालाही न घाबरता उठाव केला आहे, त्यामुळे आम्हाला विनाकारण डिवचू नका,” असा इशाराही देसाई यांनी दिला.