Satara ZP News – सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सारीपाट सध्या कमालीचा तापला आहे. अध्यक्षपद ‘ओबीसी महिला‘ प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. दहा महिला दावेदारांच्या नावांची चर्चा असली, तरी पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली पाहता सोनल गोरे यांचे नाव सध्या ‘चर्चेच्या केंद्रस्थानी’ आहे. मात्र, ही निवड केवळ एका नावापुरती मर्यादित नसून, ती आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील वर्चस्ववादाची लिटमस टेस्ट ठरणार आहे. भाजपच्या गोटातून सोनल गोरे यांचे नाव प्रकर्षाने पुढे येण्यामागे निव्वळ नशीब नसून, त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता आणि पक्षनिष्ठेचा मोठा वाटा आहे. ओबीसी मतांचे ध्रुवीकरण: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सोनल गोरे एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे आल्या आहेत. जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांचा (खा. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अतुल भोसले) सोनल गोरेंवर असलेला विश्वास ही त्यांची जमेची बाजू आहे. आक्रमक वक्तृत्व आणि ग्रामीण भागातील जनसंपर्क यामुळे त्यांना ‘मास लीडर’ म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांच्या सभागृहात सत्तेसाठी ३४ हा जादुई आकडा गाठणे कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर शक्य नाही. भाजप (२५+ जागा): सर्वात मोठा पक्ष असूनही बहुमतापासून दूर. सोनल गोरेंना अध्यक्ष करण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची मनधरणी करावीच लागेल. राष्ट्रवादी (शरद पवार/अजित पवार गट): राष्ट्रवादीकडे ३ सक्षम उमेदवार आहेत (मनीषा पाटील, जयश्री भोसले इ.). शिवेंद्रसिंहराजे भोसले – उदयनराजे भोसले जर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, तर भाजपच्या सोनल गोरेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादी मोठी खेळी खेळू शकते. शिवसेना (किंगमेकर): शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात असले, तरी त्यांची खरी ताकद ‘किंगमेकर’ म्हणून आहे. शिवसेनेचा पाठिंबा ज्याच्या पारड्यात पडेल, त्याचाच अध्यक्ष विराजमान होईल. प्रतिस्पर्ध्यांनीकडून मोर्चेबांधणी सोनल गोरेंव्यतिरिक्त जयश्री भोसले, लता कर्ण, मनीषा पाटील, मनीषा फडतरे यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. साताऱ्याच्या जनतेला केवळ ‘चेहरा’ नको, तर सक्षम, संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्व हवे आहे. प्रशासनावर पकड असणारा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणारा अध्यक्ष निवडण्याचे मोठे आव्हान या तीनही पक्षांसमोर आहे. या निवडीत केवळ उमेदवारांची नाही, तर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवेंद्रसिंहराजे विरुद्ध शशिकांत शिंदे या पारंपरिक संघर्षाचा पडसाद अध्यक्ष निवडीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांची एकजूट झाल्यास गोरेंसाठी ‘अग्निपरीक्षा’ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देसाई कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावर सोनल गोरेंचे भवितव्य अवलंबून असेल. सोनल गोरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचे बळ आणि नेत्यांचा वरदहस्त असला तरी, राजकारणात ‘शेवटच्या क्षणी’ होणारे बदल धक्कादायक असतात. जर सोनल गोरे अध्यक्ष झाल्या, तर भाजपचा साताऱ्यातील प्रभाव कित्येक पटीने वाढेल. मात्र, विरोधकांनी एकजूट केल्यास ही निवडणूक सोनल गोरेंसाठी ‘अग्निपरीक्षा’ ठरेल. साताऱ्याचा ‘सातबारा’ कोणाच्या नावावर होणार? याचे उत्तर लवकरच मिळेल, पण तोपर्यंत ‘सोनल गोरे’ हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार हे निश्चित!