Amit Thackeray – राज्यात ड्रग्जचा विळखा वाढत चालला असून, तरुणाई उद्ध्वस्त होत आहे. हे थांबवण्याची ताकद सध्याच्या सरकारमध्ये नाही. राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, जर पोलिसांनी २४ तासांसाठी पूर्ण मोकळीक दिली, तर राज्यातील सर्व गुन्हेगार एका दिवसात ताळ्यावर येतील, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. पुणे शहर आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमित ठाकरे यांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवताना ड्रग्ज, धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शाळांच्या परिसरात ड्रग्जची विक्री होणे हे दुर्दैवी आहे. आम्ही सत्तेत असतो, तर अशा आरोपींना थेट फासावर चढवले असते, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या पोर्शे प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणावर टीका केली. त्याचबरोबर नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि छळाच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी राज्यातील सर्व कंपन्यांचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या हातात द्या, ते संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी मुळापासून साफ करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत देत, २५ एप्रिलपासून पुणे ग्रामीण भागाचा दौरा करून सविस्तर अहवाल राज ठाकरेंना सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.