Congress-AAP Alliance : ‘कॉंग्रेसशी झालेल्या आघाडीमुळे दिल्लीत नुकसान होणार’; आप नेत्याचे विधान चर्चेत !

Somnath Bharti | Congress | AAP – हरियाणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू असताना आपचे दिल्लीतील मालवीय नगर येथील आमदार सोमनाथ भारती यांनी आघाडीला विरोध केला आहे. या आघाडीमुळे आपचे दिल्लीत नुकसान झाल्याचे नमूद करत त्यांनी हरियाणात आघाडी केली जाऊ नये असे म्हटले आहे.
सोमनाथ भारतींच्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेसच्या नेत्या मुमताज पटेल म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत कोणाच्या फायद्यासाठी किंवा तोट्यासाठी आघाडी झाली नव्हती तर देशाच्या भल्यासाठी आघाडी करण्यात आली होती.
मुमताज पटेल म्हणाल्या की, इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली देशातील सर्व विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र आले होते. हरियाणाच्या संदर्भात आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते करतील. आघाडीबाबत जी काही विधाने केली जात आहेत ती अशीच सुरू राहतील.
मात्र जेथे जेथे लोकसभेसाठी आघाडी झाली होती तेथे सर्वच पक्षांनी परस्परांना पूर्ण साथ दिली. तसे झाले नसते तर आज जे निकाल आले आहेत तसे ते आले नसते. कॉंग्रेसच्या गुजरातमधील नेत्या असलेल्या मुमताज पटेल जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाल्या की कलम ३७० रद्द केल्यानंतरही दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडत आहेत.
दहशतवादी आपल्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या जनतेला राज्यात बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पंतप्रधानांनी घुसखोरीच्या आणि मंगळसूत्राच्या गप्पा केल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा भाजपकडून निवडणुकीच्या काळात द्वेषाचे राजकारण सुरू केले जाईल.





