Alandi News – तीर्थक्षेत्र आळंदी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. 18) भाजी मंडई परिसरात कुत्र्यांच्या टोळक्याने सहा वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेसह शहरात एकाच दिवशी तब्बल 12 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. भाजी मंडई परिसरात खेळत असलेल्या परी ज्ञानेश्वर उदमले (वय 6) हिच्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. एका कुत्र्याने तिच्या पायाला गंभीर चावा घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, स्थानिक तरुणांनी तत्परता दाखवत कुत्र्यांना हुसकावून लावल्याने मोठी दुर्घटना टळली. जखमी बालिकेला तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेसोबतच शहरातील विविध भागांत कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना घडल्या. परी उदमलेसह अवधूत कोले, आकाश हटकर, रितेश गोडके, सम्यक आडमुखे, सागर खनोजिया, बाबासाहेब सोलंखी, मंदाबाई वाघ, साई ठाकूर, राजेश धुळगंड, रितिक काकडे आणि रिखाई प्रसाद असे एकूण 12 जण जखमी झाले आहेत. सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. भटक्या कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, भाविक तसेच रोजंदारी कामगार त्रस्त झाले आहेत. वारंवार कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.नागरिकांनी आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने नसबंदी (-इउ) मोहीम प्रभावीपणे राबवावी, तसेच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “कुत्रा चावल्यानंतर 0, 3, 7 आणि 28 या दिवशी रेबीज लसीचे डोस घेणे अत्यावश्यक आहे. तसेच जखमेवर तातडीने अँटिसेप्टिक उपचार करून नियमित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.” – डॉ. ऊर्मिला शिंदे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय