प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – पूर्वी लिहिता-वाचता येणारा साक्षर समजला जायचा, नंतर संगणक वापरणारा साक्षर म्हणून ओळखला गेला. मात्र आता एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) काळ आहे. येणार्या काळात जे विद्यार्थी एआयचे शिक्षण घेतील, तेच खर्या अर्थाने साक्षर ठरतील. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एआयविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. पौड रोड येथील मुख्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार या वेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री पवार होते. या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, तसेच संस्था सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाखाप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा सुरू असून जगभरात एआयचा वापर वाढत आहे. कृषीक्षेत्रात एआयसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. संस्थेची प्रगती ही शिक्षक, पदाधिकारी आणि कर्मचार्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे शक्य झाली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एल. एम. पवार यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सीताराम अभंग यांनी केले. या वेळी अजित पवार यांची खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी आणि खासदार सुनेत्रा पवार यांची महिला सशक्तीकरण संसदीय समितीच्या सदस्यपदी तसेच राज्यसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. आर. पी. पाटील यांच्या पुस्तकाचे आणि ओतूर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या नियतकालिकाचे प्रकाशनही करण्यात आले. गुणवंतांचा गौरव.. हडपसरच्या आण्णासाहेब मगर महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ राठी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत या महाविद्यालयाच्या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. निगडी आयुर्वेद महाविद्यालयाला नॅक समितीकडून ए ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मोहीनी खलाणे, डॉ. सोमेश वराडे, डॉ. सागर चांगर, सायली अरूडे, आदिती गोंड, डॉ. योगेश पवार यांचा गौरव झाला. पेटंट प्राप्त अध्यापक, क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेते विद्यार्थी व प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झालेल्या एनसीसी कॅडेट्सचा सन्मान करण्यात आला.