Purandar Airport : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाचा भूसंपादनाचा तिढा सुटला असला तरी काही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे पुरंदर विमानतळाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. विमानतळास जमिनी देण्यास विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना इतर ठिकाणी शेतीवाडी करता येईल, त्यासाठी त्यांचे त्याच भागात पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. विमानतळ करण्यासाठी अनेक जागा पाहिल्या. मात्र, पुरंदर तालुक्यातील सासवडजवळील जागा विमानतळासाठी योग्य ठरली. तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांना नाराज न करता विश्वासात घेऊन विमानतळ करण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाच्या पॅकेजबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे देखील तिथे उपस्थित होते. नेमकं काय म्हणाले अजित पवार? पुरंदर विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना विश्वासात घेऊन तेथे विमानतळ करायचा, असे मंत्रिमंडळाने ठरविले आहे. सध्याचे पुण्याचा विमानतळ संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे पुण्याला दोन धावपट्ट्या करण्याची गरज आहे. त्यानुसार कॅार्गेा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. सध्या जेवढे क्षेत्र घेत आहोत, त्यात एकही गाव जात नाही. पूर्वी संपादित करण्यात येणाऱ्या गावांपैकी काही क्षेत्र कमी केले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली. अजित पवारांंकडून आवाहन पुरंदर विमातळाबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. यावर भाष्य करताना पुरंदरमधील शेतकरी हे आमचेच लोक आहेत. कृपा करून गैरसमज घेऊ नका, गैर अर्थ काढ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.