Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात प्रशासकीय कौशल्य, वेगवान निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांनी राज्याच्या अर्थव्यवस्था, शेती, शिक्षण, क्रीडा आणि पायाभूत सुविधांना नवी दिशा दिली. त्यांच्या कारकिर्दीतील १० महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयांचा थोडक्यात आढावा घेऊया. १. राज्याचे ‘फायनान्स मॅनेजर’, अर्थसंकल्प आणि जीएसटीत अग्रेसर अर्थमंत्री म्हणून जिल्हास्तरीय निधी वितरणात पारदर्शकता आणि वेग आणला. करचोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या. जीएसटी संकलनात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणण्यात त्यांचा मोठा वाटा. २. जलसंपदा क्षेत्रातील क्रांती जलसंपदा खात्यावर असताना कृष्णा खोरे, मराठवाडा आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती दिली. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यामुळे राज्यातील सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. ३. पदकविजेत्या खेळाडूंना थेट सरकारी नोकरी क्रीडामंत्री म्हणून पदकविजेत्या खेळाडूंना ५ टक्के आरक्षणांतर्गत थेट सरकारी नोकरी देण्याचे धोरण आणले. ग्रामीण भागातील खेळाडूंना शहरात येण्याची गरज पडू नये म्हणून ‘तालुका क्रीडा संकुल’ उभारण्यावर भर दिला. ४. आधुनिक शेतीला प्रोत्साहन – AI, बांबू आणि बोनस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बांबू लागवडीसारख्या नव्या प्रयोगांना चालना दिली. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला. दूध संघ आणि स्थानिक बँकांना मजबूत करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला. ५. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ च्या अर्थसंकल्पात आणलेली ही महत्त्वाकांक्षी योजना. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी हा ऐतिहासिक पाऊल मानला जातो. ६. विकासाची ‘पंचसूत्री’ राज्याच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि रोजगार यांच्यावर केंद्रित ‘पंचसूत्री’ मांडली. २०२५ च्या बजेटमध्ये महाराष्ट्रात ४० लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे ध्येय ठेवले. ७. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुशिक्षित बेरोजगारांसाठी दरवर्षी १० लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणारी योजना सुरू केली. १२वी पास ते पदवीधर तरुणांना दरमहा ६,००० ते १०,००० रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते. ८. तांत्रिक शिक्षणात ‘पीएम सेतू’ योजना नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील ITI मध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबवली. तरुणांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. ९. पायाभूत सुविधांचा विस्तार – मेट्रो आणि मिसिंग लिंक पुणे मेट्रोचा विस्तार आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील लोणावळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घातले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होणार आहे. Ajit Pawar Funeral १०. हरित ऊर्जा आणि वीज दर कपात पुढील ५ वर्षांत १.१३ लाख कोटी रुपयांची वीज खरेदी बचत करण्यासाठी ‘ग्रीन एनर्जी’कडे वळण्याचे धोरण आखले. उद्योगांना स्वस्त वीज मिळवून देऊन राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न. अजित पवार यांच्या या निर्णयांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती दिली. त्यांच्या अकाली निधनाने राज्याला भरून न निघणारी हानी झाली आहे. आज (२९ जानेवारी) बारामतीत त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असून, संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. त्यांच्या कार्याचा ठसा कायम राहणार आहे.