Ajinkya Rahane Statement : “वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवा..!”, अजिंक्य रहाणेचा टीम इंडियाला थेट सल्ला, नेमकं कारण काय?
Ajinkya Rahane Statement : अजिंक्य रहाणेची इच्छा आहे की भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळावे.

Ajinkya Rahane Backs Sanju Samson Over Vaibhav Sooryavanshi Playing 11 Afghanistan T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने पदार्पणानंतर चमकदार कामगिरी केली असली, तरी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने त्याला या मालिकेत अंतिम प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रहाणेच्या मते, वैभवऐवजी संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा अभिषेक शर्मासोबत डावाची सलामी देण्याची संधी मिळायला हवी.
१५ व्या वर्षी पदार्पण; आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यावर वैभवचा डंका –
वैभव सूर्यवंशीसाठी चालू वर्ष अत्यंत स्वप्नवत ठरले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुटल्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातही दमदार खेळ दाखवला. वैभवच्या आगमनामुळे इंग्लंड दौऱ्यात सलग तीन अपयशांनंतर संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, आगामी अफगाणिस्तान मालिकेसाठी दोघांचीही भारतीय संघात निवड करण्यात आली असून सलामीला कोणाला पाठवायचे, हा संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
‘त्याचे दिवस येतील, पण आत्ता संजूला संधी द्या’; रहाणेने मांडली भूमिका!
Ajinkya Rahane urges Indian team to back Samson, says Sooryavanshi will get his opportunities
Ajinkya Rahane said:
“I feel the top three should be the same that played in the World Cup. Samson has done well, but he got dropped after two or three bad innings. I want him to get… pic.twitter.com/KeauUte4tY
— Cricket Hub (@Anurag9793) September 11, 2026
अजिंक्य रहाणेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना संजू सॅमसनची जोरदार पाठराखण केली. रहाणे म्हणाला, “टी-२० विश्वचषकात ज्या टॉप-३ फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, तेच कायम राहिले पाहिजेत. संजूने चांगली कामगिरी केली होती, फक्त दोन-तीन अपयशी डावांनंतर त्याला बाहेर काढणे योग्य नाही. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या तिघांनाच अव्वल फळीत संधी दिली पाहिजे. वैभव सूर्यवंशी नक्कीच गुणवान आहे, त्याचीही वेळ येईल; पण आत्ता संजूला खेळवणे गरजेचे आहे.”
१३ सप्टेंबरपासून दिल्लीत महामुकाबला; बुमराह फिट तर ठाकूरची एन्ट्री!
अफगाणिस्तानविरुद्धचे तिन्ही टी-२० सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी रंगणार आहेत. दुखापतग्रस्त हर्षित राणाच्या जागी विदर्भाच्या यश ठाकूरला संघात संधी मिळाली असून, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवतो की अजिंक्य रहाणेच्या सल्ल्यानुसार संजू सॅमसनवर पुन्हा विश्वास दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





