Krishi Din Satara: शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार डबल? कृषी दिनी जिल्हा परिषदेतून डॉ. प्रिया शिंदे यांची मोठी घोषणा
Krishi Din Satara: कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न; बदलत्या काळात सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे डॉ. प्रिया शिंदे यांचे आवाहन.

Krishi Din Satara – शेतकरी आपल्या देशाच्या प्रगतीचा मुख्य पाया असून देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. बदलत्या काळात आता सेंद्रिय शेतीला आणि सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता सेंद्रिय शेतीकडे वळून आपले उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व शेतकरी सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाला. याप्रसंगी कृषी सभापती लता कर्णे, महिला व बाल कल्याण सभापती ऋतुजा शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे,
आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पशुसंवर्धन उपायुक्त दिनकर बोर्डे, डॉ. विवेक भोइटे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, हणमंतराव जगदाळे, अजित साळुंखे, अमित चव्हाण, वृषाली चव्हाण यांच्यासह विशेष समित्यांचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाल्या, ‘‘हरितक्रांतीचे जनक असलेल्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठांची स्थापना केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. अनेक धरणांची उभारणी करुन शेतीसाठी सिंचन क्षमता वाढविली. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे व पर्यायाने कृषी उत्पन्नही घटले आहे.
त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी व जमिनीतील जैविक क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसमृद्धी अभियानांतर्गत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून पाणी अडविण्यात येणार आहे.’’ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचाही लाभ देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
सौ. लता कर्णे म्हणाल्या, ‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याचे संरक्षण करणे आपली प्राथमिक जबाबदारी आहे.’ यावेळी भाग्यश्री फरांदे, हणमंतराव जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जे.के. बसू सेंद्रिय शेती पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन व कै. यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ. अंजली गोडसे यांनी सूत्रसंचालन केले.






