Elections News : हरियाणाच्या अपयशानंतर कॉंग्रेससमोर आणखी दोन अवघड पेपर ! महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये धाकट्या भावाच्या भूमिकेत राहणार का?

नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्याचबरोबर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपत आहे. हरियाणा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस या दोन विधानसभा निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
मात्र, दोन्ही राज्यात सत्ता हस्तगत करणे कॉंग्रेससाठी म्हणावे तेवढे सोपे नसणार आहे. त्याचे कारण या दोन्ही राज्यांतील स्थिती आणि समीकरणे वेगवेगळी आहेत. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवर निवडणूक होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झामुमोने ४९ जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत काँग्रेस, आरजेडी आणि सीपीआय एमएलला केवळ ३२ जागांवरच लढता येणार आहे. कॉंग्रेसला ही बाब अमान्य आहे. गेल्या वेळी काँग्रेसने ३१ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसने ३३ जागांवर दावा केला आहे.
भाजप आणि जेव्हीएममधील प्रत्येकी एक आमदार त्यांच्या पक्षात सामील झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अशा स्थितीत त्यांना आणखी दोन जागा मिळायला हव्यात. अशा स्थितीत झारखंडमधील इंडिया आघाडी जागावाटपाच्या बाबतीत कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व ८१ जागा लढवेल.
जेएमएमच्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर हेमंत सोरेन यांनी पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीवर विश्वास व्यक्त केला आणि आघाडी राज्यात पुन्हा सत्ता मिळवेल असे आश्वासन दिले.
ते म्हणाले, जेएमएमच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत मी सर्व कार्यकर्ते आणि कार्यकारी समिती सदस्यांसह सहभागी झालो होतो. आम्ही आमच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे.
महाराष्ट्रातही कॉंग्रेस धाकटा भाऊ
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे उत्साहित झालेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसायचे आहे.
पक्षाला येथे ११५ जागा लढवायच्या आहेत. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला आपला मोठा भाऊ बनवायला तयार नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या तुल्यबळ जागांवर निवडणूक लढवायची आहे.
त्याचवेळी आघाडीचा तिसरा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही जवळपास ८० जागांवर निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस १००- ११० जागा, शिवसेना (उद्धव) १००-११० जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ८०-८५ जागा असा संभाव्य फॉर्म्युला आहे. यामध्ये डावे पक्ष आणि इतर लहान पक्षांचेही समायोजन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत खडाजंगी सुरू आहे. मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याची मागणी उद्धव ठाकरेंची शिवसेना सातत्याने काँग्रेसकडे करत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचा मार्गही काँग्रेससाठी सोपा दिसत नाही.





