Narayan Rane : भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमधील कार्यक्रमात त्यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भाषण करत असताना नारायण राणेंना चक्कर आल्याने कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात राणेंचा आवाज बसल्याचं दिसून आलं. चक्कर येत असल्याची भावना झाल्यानंतर त्यांनी भाषण तात्काळ आटोपत घेतलं. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला. कार्यक्रमस्थळावरून नारायण राणे थेट विश्रामगृहाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी तसेच मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची काळजी घेतली. दरम्यान, काल सिंधुदुर्गातील सभेत बोलताना नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले होते. वय झालं असल्याने आता थांबायला हवं, दोन्ही मुले राजकारणात स्थिर झाली आहेत आणि उद्योग सांभाळण्यासाठीही कुणीतरी पाहिजे, असं ते म्हणाले होते. “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. राजकारणात कटकारस्थानं झाली, अडचणी आल्या. त्यामुळे आता ठरवलंय, घरी बसायचं. मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे, चांगल्याला जोपासा,” असे भावनिक वक्तव्य राणेंनी केलं होतं. राजकीय निवृत्तीचे संकेत आणि त्यानंतर प्रकृती खालावण्याची घटना यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.