‘आयुष्यात आलेली माणसं वेळ आली की रंग दाखवतात…’, होळीच्या निमित्ताने केलेली कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal Badrike | ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. हे कलाकार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याने पोस्ट केलेले फोटो अथवा कॅप्शन हे चर्चेचा विषय बनतात. आता अभिनेत्याच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
होळीच्या निमित्ताने कुशलने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशलने स्वतःचे फोटो शेअर करत हटके कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिलेल्या या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले. आयुष्यात आलेली काही माणसं त्यांची वेळ आली की आपआपले रंग दाखवतात आणि निघून जातात, असे म्हणत होळीच्या निमित्ताने त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
View this post on Instagram
कुशलने फोटो शेअर करत लिहिले की, ‘आयुष्यात आलेली काही माणसं, त्यांची वेळ आली की आप-आपले रंग दाखवतात आणि निघून जातात, असल्या अनुभवांनी आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पण ह्या दोन्ही प्रकारच्या रंगानी होळी (धुळवड) खेळता येत नाही.’
‘ज्या रंगानी ती खेळता येते त्यातले बरेचसे रंग कोणत्या ना कोणत्या तरी समाजाने वाटून घेतलेत नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाने वाटून घेतलेत . ह्या होळीत जर चुकून माझ्या कडून असा एखादा रंग उधळला गेलाच तर तो “होळीचाच” होता, हे मी आत्ताच जाहीर करतो. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू माझ्या “अंत-रंगात” नाही. ह्या दिवशी पाण्याने होळी खेळणाऱ्याची तर बिनपाण्याने केली जाते.’, असेही त्याने लिहिले. कुशलची ही पोस्ट व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.





