Domestic Gas: भारतातील सर्वात मोठी तेल कंपन्या असलेल्या इंडियन ऑइल कार्पोरेशन म्हणजे आयओसीने देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी गरज नसताना गॅसचे बुकिंग करण्याचे टाळावे. त्यामुळे या क्षेत्रात निर्माण झालेली अस्थिरता कमी होण्यास मदत होईल असे या कंपनीने म्हटले आहे. युद्ध सुरू होण्याअगोदर आणि युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील तेल कंपन्यांनी तेल आणि गॅस उपलब्ध करण्यासाठी पर्यायी योजनांचा वापर केलेला आहे. त्यामुळे या बाबींचा देशात आतापर्यंत तरी कसलाही तुटवडा निर्माण झालेला नाही. मात्र तुटवडा होण्याची शक्यता गृहीत धरून बरेच नागरिक गरज नसताना बुकिंग करीत आहेत. गेल्या काही आठवड्यातील परिस्थिती पाहून आता नागरिकांनी गरज नसताना बुकिंग करणे थांबविले आहे. त्यामुळे परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे या कंपनीने नमूद केले. सध्या आयओसी कंपनी रोज देशभरात 28 लाख गॅस सिलेंडरचे वितरण करीत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी एवढ्याच प्रमाणात गॅस सिलेंडरचे वितरण केले जात होते. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाली असल्याचे स्पष्ट होते. गरज नसताना नागरिकांनी बुकिंग करणे टाळावे यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात येत आहेत. 87% रिफील बुकिंग डिजिटल व्यासपीठावरून करण्यात येत आहे. तर प्रत्यक्ष गॅस ओटीपी आधारित वितरित केला जात आहे. त्यामुळे परिस्थिती वेगाने पूर्ववत होत आहे. हेही वाचा – भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; भारतीय वस्तूंसाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली होणार! युद्ध सुरू झाल्यापासून आज पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅसला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यामध्ये घरासाठी लागणार्या गॅसच्या पुरवठ्यावर कसलाही परिणाम झालेला नाही. इतर क्षेत्रासाठी मर्यादित प्रमाणात गॅस उपलब्ध केला जात आहे. तोही शिस्तबद्ध रीतीने पुरविला जात आहे. त्यामुळे या आघाडीवर संतुलित परिस्थिती आहे. गॅस आणि खनिज तेलाच्या आयातीसाठी पूर्वीपेक्षा जास्त काळ लागत आहे. मात्र आता हा पुरवठा नियमित होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती अधिक सुरळीत होऊ शकणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी 7,500 तपासण्या करण्यात आल्या व 141 वितरकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यातील पाच जणांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच 855 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या कालावधीत 48 हजार सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. गैरप्रकार करणार्यांवर कारवाई – गॅसच्या संबंधात गैरप्रकार करणार्या एजन्सीवर किंवा काही कर्मचार्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिक त्यांच्या अडचणी समाज माध्यमावर मांडत आहेत. पेट्रोलियम मंत्रालय याकडे लक्ष ठेवून आहे आणि याची शहानिशा केली जात आहे. जर कोणी गैरप्रकार करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे असे गैरप्रकार आता पूर्णपणे थांबले असल्याचेही या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले.