Omkar Karve : मालिकेतून अचानक हकालपट्टी, कामासाठी संघर्ष; ऑरगॅनिक शेतीतही नुकसान, लॉकडाऊनमध्ये रद्दी विकण्याची वेळ, ओमकार कर्वेंचा संघर्षकाळ
Omkar Karve : त्यानंतर त्याने ऑरगॅनिक शेतीचा मार्ग निवडला; मात्र तिथेही त्यांच्या पदरी नुकसानच आलं. एका मुलाखतीत ओमकार कर्वेने त्याच्या या संघर्षकाळाचा अनुभव सांगितला.

Omkar Karve : मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नवोदित कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. अनेक ऑडिशन्स, सततची मेहनत आणि त्यानंतर मिळणारे रिजेक्शन या सगळ्याला सामोरं जावं लागतं. काम मिळाल्यानंतरही या क्षेत्रात सातत्य टिकेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेक कलाकार सातत्याने येणाऱ्या अपयशाला कंटाळून मनोरंजनविश्वापासून दूर जातात. अभिनेता ओमकार कर्वे यांच्याबाबतीतही काहीसं असंच घडलं. टेलिव्हिजनवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्याच्या करिअरला अचानक ब्रेक लागला. त्यानंतर त्याने ऑरगॅनिक शेतीचा मार्ग निवडला; मात्र तिथेही त्यांच्या पदरी नुकसानच आलं. एका मुलाखतीत ओमकार कर्वेने त्याच्या या संघर्षकाळाचा अनुभव सांगितला.
ओमकाराने ‘आभाळमाया’, ‘अधुरी एक कहाणी’ आणि ‘चक्रव्यूह’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय काही मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. मनोरंजनविश्वातील प्रवास सुरळीत सुरू असतानाच एका मालिकेतून त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलं. त्यानंतर मात्र बराच काळ त्याला काम मिळालं नाही. या काळात त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे निर्मात्यांसोबत वाद झाल्याचंही त्यांने सांगितलं.
माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली.
ओमकार याने त्याच्या इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना म्हटलं, “दिग्दर्शक रवी करमरकर यांच्या ‘वहिनीसाहेब’ मालिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. ऑडिशन दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत माझी निवड झाली. या मालिकेत मी विश्वास किर्लोस्करची भूमिका साकारली. ही भूमिका माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली. ‘वहिनीसाहेब’ या मालिकेने मला खूप काही दिलं. चांगली माणसं दिली.”
घर कसं चालणार, हा प्रश्न सतत सतावत होता.
मात्र, पुढे परिस्थिती अचानक बदलली. याबाबत ओमकारने सांगितलं, “मी अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं. सगळं व्यवस्थित सुरू होतं; पण त्यानंतर माझ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. एका मालिकेत काम करत होतो. सुरुवातीला सगळं छान सुरू होतं. मात्र, पाच-सहा महिने असे आले की दिवस भरत नव्हते. घर कसं चालणार, हा प्रश्न सतत सतावत होता. त्यामुळे माझी चिडचिड वाढली. माझा वाद झाला आणि मला मालिकेतून कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलं. २०१५ नंतर मला कुठेच काम मिळत नव्हतं. खूप प्रयत्न करूनही परिस्थिती बदलत नव्हती. त्यामुळे शेवटी मी माझं क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला.” असंही ओमकार यांनी सांगितलं.
ऑरगॅनिक शेतीतही मोठं नुकसान
मनोरंजनविश्वापासून काही काळ दूर जात ओमकार यांनी ऑरगॅनिक फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला. आपल्या ओळखीतील काही जणांना सोबत घेत त्यांनी नाशिकमध्ये जवळपास तीन महिने शेती केली. याविषयी बोलताना ओमकार म्हणाला “होता नव्हता तो सगळा पैसा शेतीत ओतला. मेहनत घेतल्यानंतर शेतात उत्तम पीक येऊ लागलं. ऑर्डर्सही मिळायला सुरुवात झाली. सगळं काही चांगलं सुरू झालं होतं. मात्र, एका भाजीची ऑर्डर देण्यासाठी जात असताना माझा अपघात झाला. उपचारासाठी मला मुंबईला यावं लागलं. हातामध्ये प्लेट बसवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि माझ्यावर ऑपरेशन झालं.”
लॉकडाऊनमध्ये रद्दी विकण्याची वेळ
शेतीत मोठं नुकसान झाल्यानंतर लॅाकडॅाऊनमध्ये मोठ्या संकटाचा सामाना करावा लागला असल्याचे त्याने सांगितले. या परिस्थितीवर हार न मानता ओमकाराने पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. हळद आणि ज्वारीचं पीठ विकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यातून फारशी कमाई होत नव्हती. “दोन वेळचं जेवण मिळेल एवढेच पैसे मिळायचे. त्यातच अचानक लॉकडाऊन लागला आणि हातातले पैसे संपले.परिस्थिती इतकी बिकट झाली की घरातील रद्दी विकावी लागली. त्या रद्दीतून जे पैसे मिळाले, त्यातून भाजी आणली. नातेवाईकांकडेही आर्थिक मदत मागितली. त्यांच्या मदतीमुळे पुढे आंब्याचा व्यवसाय सुरू करता आला,” अशी संघर्षमय कहाणी ओमकार कर्वे यांनी सांगितली.
National Sports Day : पर्वत, पायवाटा आणि साहसाची क्रीडादृष्टी





