माकप नेते तारिगामी: काश्मीरमध्ये जे घडत आहे; ते देशाच्या हिताचे नाही
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या अटकेवरून त्या राज्यातील माकप नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. काश्मीरमध्ये जे घडत आहे; ते देशाच्या हिताचे नाही. अब्दुल्ला दहशतवादी नाहीत आणि मीसुद्धा परदेशी नाही, असे तारिगामी यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून तारिगामी यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी मंगळवारी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या निर्णयावरून तारिगामी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याच्या सरकारच्या दाव्याशी त्यांनी असहमती दर्शवली. धर्मनिरपेक्ष भारताबरोबर राहण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरमधील जनतेने घेतला. मात्र, आता त्या जनतेला सध्याच्या राजवटीकडून कुठल्या अपेक्षा राहिलेल्या नाहीत. जनतेला मारहाण करून, तुरूंगात ठेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केला जाऊ शकतो का, असा सवाल त्यांनी केला. सरकार सांगते त्यापेक्षा काश्मीरमधील स्थिती पूर्ण वेगळी असल्याचे यावेळी येचुरी यांनी म्हटले.