Aamir Khan-Gauri Spratt Wedding : भर पावसात आमिरच्या लग्नाला पोहोचले राज ठाकरे आणि मुकेश अंबानी; तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला अभिनेता
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याने अखेर त्याची दीर्घकाळची मैत्रीण 'गौरी स्प्रॅट' हिच्यासोबत विवाहबंधनात प्रवेश केला आहे.

Aamir Khan-Gauri Spratt Wedding : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याने अखेर त्याची दीर्घकाळची मैत्रीण ‘गौरी स्प्रॅट’ हिच्यासोबत विवाहबंधनात प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे (पाली हिल) येथील आमिरच्या निवासस्थानी रविवारी अत्यंत खासगी आणि साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
कुटुंबीय, जवळचे मित्र आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहाची सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे. मुसळधार पावसालाही न जुमानता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नवदाम्पत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत नोंदणीकृत विवाह :
आमिर आणि गौरी यांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत विवाह केला. मोठ्या सेलिब्रिटी लग्नांप्रमाणे भव्य सोहळा न करता, दोघांनी अत्यंत साधेपणाला प्राधान्य दिले.
या सोहळ्यासाठी केवळ जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि दोघांच्या कुटुंबातील सदस्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. हा आमिर खानचा तिसरा विवाह असून यापूर्वी त्याचा विवाह रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत झाला होता.
भर पावसात राज ठाकरे पोहोचले :
आमिर खान आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हीच मैत्री जपत मुसळधार पावसात राज ठाकरे स्वतः हातात लाल गुलाबांचा गुच्छ घेऊन आमिरच्या घरी पोहोचले. त्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुकेश अंबानींच्या ताफ्यासमोर झाड कोसळल्याची घटना :
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा ताफा आमिरच्या निवासस्थानाकडे जात असताना मुसळधार पावसामुळे रस्त्यावर एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुरक्षेच्या कारणास्तव ताफा काही काळ थांबवण्यात आला.
त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यावर अंबानी आमिरच्या घरी पोहोचले आणि नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती :
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही आमिरच्या लग्नाचा उत्साह कायम होता. बंगल्याची आकर्षक फुलांची आणि रोषणाईची सजावट करण्यात आली होती.
या खासगी विवाहसोहळ्याला आमिरची बहीण, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, अभिनेत्री एली अवराम यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक जवळचे मित्र उपस्थित होते.
विवाहानंतर नवदाम्पत्यासाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या जेवणाचा मेनू स्वतः आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी मिळून तयार केल्याची माहिती समोर आली आहे. साधेपणा, कुटुंबीयांची उपस्थिती आणि जवळच्या मित्रांच्या सहवासात पार पडलेला हा विवाहसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.






