सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी नाकारली अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले,“उद्धव ठाकरेंची शिवसेना…”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी आज फेटाळून लावली आहे. त्यासोबतच या प्रकरणी पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी, “सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठवण्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचं ते आम्ही ठरवू, असेही न्यायालयाने नमूद केलं.”म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी,“आम्हालाही वाटत होतं की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर निकालच लागू नये हे त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण होतं. त्याच धर्तीवर हा निकाल आला आहे. आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल,” असे मत व्यक्त केले.
दरम्यान, “मला तुरुंगात जीवे मारण्याचा कट होता”, असे संजय राऊत यांनी आज सकाळी आरोप केले. या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत काहीही आरोप करू शकतात. संजय राऊत दिवसातून तीनवेळा आरोप करतात. सकाळी कोणता आरोप केला हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यावर मी काय उत्तर देणार आहे,” असे उपहासात्मक उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.





