Indrayani Nagar: स्वच्छतेच्या फलकासमोरच कचऱ्याचा ढीग! इंद्रायणी नगरात अस्वच्छतेचे चित्र
Indrayani Nagar: नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भोसरी – इंद्रायणी नगर परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या महापालिकेच्या फलकासमोरच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. एका बाजूला ‘कचरा टाकू नका, परिसर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारा फलक, तर त्याच फलकासमोर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग, अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. कचरा उचलण्यासाठी नियमित व्यवस्था असतानाही तो वेळेत उचलला जात नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारा महापालिकेचा फलक लावण्यात आला आहे, त्याच ठिकाणी कचरा साचल्याने या जनजागृतीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
या रस्त्यावरून नागरिक, शाळकरी विद्यार्थी, पादचारी आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. कचरा साचल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत असून दुर्गंधीचाही त्रास होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात कचरा ओला झाल्यास दुर्गंधी वाढण्याबरोबरच डास, माशा व इतर कीटकांचा उपद्रव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तसेच, साचलेल्या कचऱ्यावर भटक्या जनावरांकडून ताव मारला गेल्यास तो रस्त्यावर विखुरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेकडून स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले, तरी प्रत्यक्षात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फलकासमोरच कचऱ्याचा ढीग दिसत असल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ जनजागृतीचे फलक लावून उपयोग नसून, त्या फलकाच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
संबंधित विभागाने या ठिकाणचा कचरा तातडीने उचलून परिसराची स्वच्छता करावी, तसेच भविष्यात येथे पुन्हा कचरा साचू नये यासाठी नियमित पाहणी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून प्रत्यक्षात स्वच्छता राखण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Pune District : चाकणच्या वाहतूक समस्येवर उपाय की आश्वासनांचा पाऊस?




