Teacher Recruitment: मुलाखतीद्वारे शिक्षक भरतीसाठी ७८०५ उमेदवारांची शिफारस

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातुन पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन खासगी अनुदानीत शिक्षण संस्थामध्ये मुलाखतीद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत १ हजार ९६ शैक्षणिक संस्थांमधील ४ हजार ८७९ रिक्त पदांसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. निवड समितीमार्फत उमेदवारांच्या घेण्यात येणाऱ्या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरणही करावे लागणार आहे.
मुलाखतीशिवाय’ या प्रकारातील १६ हजार ७९९ या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसुत्रता राखण्याच्यादृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
मुलाखतीसह पदभरती मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी, अकरावी ते बारावी या गटातील पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरत्तीची सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शक रित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.
निवड प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा, कागदपत्र सोबत जोडावेत. शिक्षणाधिकारी यांनी तक्रार अर्जाची शहानिशा तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळविण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारअर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपीलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे.





