Nagar | थोरात कारखान्याकडून 3015 रुपये भाव जाहीर

संगमनेर, (प्रतिनिधी)- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था काम करत असून या संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे.
एकरी जास्तीत-जास्त उत्पादन वाढवताना कार्यक्षेत्रात 10 लाख टनापेक्षा जास्त ऊस निर्माण झाला पाहिजे. चांगला सहकार व चांगली संस्कृती आपल्या सर्वांना जपायची असून, मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे भाव कारखान्याने जाहीर केला असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते.
व्यासपीठावर मा.आ.डॉ सुधीर तांबे, कांचनताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, व्हा. चेअरमन संतोष हासे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, संचालक रमेश गुंजाळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, सहकारी संस्थांमुळे संगमनेरची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. येथील अर्थव्यवस्था समाजजीवन आणि प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रभाव दिसत आहे. कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी या सर्वांमध्ये आनंद आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 लाख मे. टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे.
दूध संघाने सातत्याने चांगला भाव दिला असून प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबिट जाहीर करून नुकतेच 38 कोटी रुपये बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.
कारखान्याने ही यापूर्वी 2800 रुपये प्रति टन भाव दिला असून दिवाळीनिमित्त 215 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून 3015 पंधरा रुपये असा भाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. हीच समृद्ध परंपरा आपल्याला कायम जपायचे असून एकरी जास्तीत-जास्त उत्पादन करा असे आव्हान त्यांनी केले.
बाबा ओहोळ म्हणाले की, मागील तीन वर्षे आपण 10 लाख मॅट्रिक टनापेक्षा जास्त गाळप केले आहे. आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या निळवंडे धरणामुळे कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी मदत होणार असून शेतकरी सभासद व ऊस उत्पादक यांचे हित कायम कारखान्याने जपले आहे.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले .या कार्यक्रमासाठी सभासद. शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान
थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम ऊस उत्पादक ,सभासद यांचे हित जोपासण्याबरोबर कामगारांच्या जीवनातही आनंद निर्माण केला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्याच्या सर्व कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. याचबरोबर बाजारपेठेमध्ये ही मोठा आनंद निर्माण झाला आहे.





