जालना – आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले आणि त्यांनी बहिष्कार टाकला नाही. पण निवडणुका लागल्या की एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि धुळवड आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
रावसाहेब दानवे म्हणाले, ज्यांची मौत आली, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो, अशीही टीका त्यांनी केली. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. जशा निवडणूका लागतील तसे ते सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेवर निशाणा साधत ते म्हणाले की, ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतले आहे, आता हिरव्या रंगाचे समर्थन करतात. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावे. कारण दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते, असा टोला त्यांनी लगाविला.
तसेच दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी फायनांशियल डिलिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही. भगवाधारी सगळे फक्त आमच्याकडेच आहेत.
आम्ही पाठीत वार कधी केला नाही तर यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली, अशी टीकाही त्यांनी केली.