Modi Cabinet : महाराष्ट्रातील ‘या’ तरूण तडफदार नेत्याला मिळणार केंद्रात मंत्रिपद?, दिल्लीत हालचालींना वेग
Modi Cabinet : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 12 जागा रिक्त आहेत. आगामी फेरबदलात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील तरुण नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा.

Modi Cabinet : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नुकतीच आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. पुढील काही महिन्यांत मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, तरुण आणि महिला नेत्यांना अधिक संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या केंद्रातील मंत्रिपरिषदेत 29 कॅबिनेट मंत्री, पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 34 राज्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केल्यास एकूण सदस्यसंख्या 69 आहे. संविधानाच्या कलम 75(1A)नुसार केंद्रातील मंत्रिपरिषदेत जास्तीत जास्त 81 सदस्य असू शकतात. त्यामुळे सध्या 12 जागा रिक्त आहेत.
तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याने फेरबदलाची शक्यता –
अलीकडेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 12 कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आहेत. 81 वर्षीय जीतन राम मांझी हे मोदी सरकारमधील सर्वाधिक वयाचे कॅबिनेट मंत्री आहेत. तर 38 वर्षीय के. राम मोहन नायडू हे सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला 65 टक्क्यांहून अधिक मंत्री 51 ते 70 वयोगटातील होते, तर 31 ते 50 वयोगटातील मंत्र्यांचे प्रमाण सुमारे 24 टक्के होते.
कोणत्या मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या बदलणार?
फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना पदावरून हटवले जाण्याची किंवा त्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी, तर पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मंत्रीपदासोबत भाजपच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारीही आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतही निर्णय होऊ शकतो.
आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती लक्षात घेऊन काही राज्यांना केंद्रात अधिक प्रतिनिधित्व देण्याची शक्यता आहे.
नव्या मित्रपक्षांना मंत्रिपदाची संधी?
मंत्रिमंडळ विस्तारात नव्या मित्रपक्षांनाही स्थान मिळण्याची चर्चा आहे. डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार आणि अकाली दल यांसारखे पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेकडे भाजपचे लक्ष राहणार आहे. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांपासून तयार झालेल्या एनसीपीआयमधूनही एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे.
आम आदमी पार्टीमधून भाजपमध्ये आलेल्या सात राज्यसभा खासदारांपैकी एखाद्याला पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला नवे मंत्रिपद?
महाराष्ट्रालाही या फेरबदलात नवे केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. शिवसेनेचे यूबीटीचे सहा खासदार शिवसेनेत सहभागी झाल्यानंतर पक्षाची राज्यसभेतील संख्या 13 वर पोहोचली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
तरुण आणि महिलांना मिळणार अधिक संधी?
मंत्रिमंडळ फेरबदलात तरुण आणि महिला नेत्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सध्या 14 मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांचा कार्यभार आहे. यामध्ये अमित शाह, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल, एच. डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, ललन सिंह, प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, गजेंद्र सिंह शेखावत, किरेन रिजिजू, मनसुख मांडविया आणि जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे.
फेरबदलात या मंत्र्यांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्या कमी करून रिक्त जागांवर नव्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तरुण चेहऱ्यांवर भाजपची नजर असल्याची चर्चा आहे.





