Air India Plane Crash : पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा विमान अपघातात मृत्यू; कुटुंबीय अहमदाबादला रवाना

Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत भीषण अपघात झाला. ७०० फूट उंचीवर गेलेले हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले, ज्यामुळे २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सपैकी केवळ एकजण वाचला.
या दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील १२ जणांचा समावेश आहे. या अपघाताने पिंपरी-चिंचवडमधील शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर येथील २२ वर्षीय इरफान समीर शेख, जो एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता, या अपघातात मृत्यूमुखी पडला.
नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी घरी आलेला इरफान तीन दिवस कुटुंबासह होता. टेकऑफपूर्वी त्याने आईशी फोनवर संवाद साधला होता, जो त्याचा शेवटचा संवाद ठरला. या बातमीने कुटुंबीयांना धक्का बसला असून, ते सुन्न झाले आहेत.
इरफानचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याची आई आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. मात्र, डीएनए तपासणीनंतरच पार्थिव सुपूर्द केले जाईल, अशी माहिती इरफानचे काका फिरोज शेख यांनी दिली. ही दुर्घटना पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हृदयद्रावक ठरली आहे.





