पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
पुणे – शहरात सुमारे 175 धोकादायक इमारती आणि वाडे असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. दरम्यान, या सर्व इमारतींच्या मालकांना नोटीस बजाविण्यात आली असून या इमारतींची माहिती यंदा पहिल्यांदाच पोलिसांनाही देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरात दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारती तसेच वाडे कोसळण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून 2008 पासून शहरातील जुने वाडे तसेच धोकादायक इमारतींची पावसाळ्यापूर्वी पाहणी केली जाते. या इमारती तसेच वाड्यांच्या “अ’, “ब’ आणि अशा श्रेणी केल्या जातात. त्यात पडू शकणारे वाडे “अ’ श्रेणीत तर कमी धोकादायक “ब’ श्रेणीत आणि तात्पुरती दुरूस्ती करू शकता येऊ शकणारे वाडे “क’ श्रेणीत येतात. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने या वर्षी शहरात केलेल्या तपासणीत मध्यवर्ती पेठांमधील पेठांमधील 725 इमारतींची पाहणी केली. त्यात 175 इमारती व धोकादायक असल्याचे आढळून आले. इमारतीमधील रहिवाशांना आणि भाडेकरूंना त्या रिकाम्या करण्यासंबधीच्या नोटीसही बजाविण्यात आल्या आहेत. यामध्ये जुन्या वाड्यांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाने दोनवेळा या इमारतींना खाली करण्यासंबधीचे प्रकटन दोनवेळा दिले आहे. तसेच पोलिसांना यासंबंधीची कल्पना दिली आहे. यामधील काही इमारती काहीच भाग धोकादायक असल्याचे तो उतरवून घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी पोलिसांची मदतही घेतली जात असल्याचे महापालिकेच्या बांधकामाचे विभागाचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
प्रमाणपत्राने मिळतोय दिलासा
शहरातील मध्यवस्तीमधील वाड्यांमध्ये भाडेकरूंची संख्या मोठी आहे. त्यात भाडेकरू आणि मालक असे वाद होतात. त्यामुळे जुन्या वाड्यांना नोटीस बजाविल्यानंतर वाडा सोडल्यास त्यावरील हक्क जाईल, या भीतीपोटी भाडेकरुन वाडा न सोडता जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे अनेक वाडे पडण्याच्या घटना घडल्यानंतर समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यावर पर्याय म्हणून आता मात्र महापालिकेकडूनच भाडेकरू असल्यासंबधीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे संबंधित वाड्याच्या जागी कधीही पुनर्वसनाची इमारत झाली, तरी ज्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यांचा हक्क कायम राहत असल्याने त्यामुळे भाडेकरू आता धोकादायक वाडे सोडण्यास सहकार्य करत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.